बहुजननामा ऑनलाइन टीम – मनसेच्या राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत तर मंगळवारी (दि. 2) नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का बसला आहे. दरम्यान पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात पक्षांतराच्या घटना होतच असतात. यात नवीन काहीच नाही. काहीनी पक्ष सोडला म्हणून पक्षाला फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते अशा ठिकाणी उभारी घेतात. सगळ्यांना राज ठाकरे होता येत नाही, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे.
मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज वर मनसेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीला बाळा नांदगावकर यांच्यासोबच कल्याण-डोंबिवलीचे आमदार राजू पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकारणात पक्षांतराच्या गोष्टी घडतच असतात. प्रत्येक निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षात अस होत असते. यात नवीन काहीच नाही. मध्यंतरी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कितीतरी लोक सोडून दुसऱ्या पक्षात गेले, काँग्रेसचे लोकही सोडून गेले. पुढे जे काही होईल ते बघा, त्यावर मी आताच भाष्य करण्यात पॉइंट नसल्याचे नांदगावकर म्हणाले.
हळबे यांच्या पक्षांतराबाबत बोलताना कल्याण-डोंबिवलीचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हळबे यांच्यावर आरोप केला. पक्ष सोडणाऱ्यांची पक्षावर नाराजी नव्हती, असे ते म्हणत आहेत. तरीही ते दुसऱ्या पक्षात गेले. मग यामागे समोरच्या पक्षाकडून आमीष दिल गेल नाही, तर मग इतर दुसर कारण काय असू शकते, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.