नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिजिटल पद्धतीने सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी आगामी काळातील रस्ते, महामार्ग योजनांसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली असून येणाऱ्या काळात केंद्र सरकारने ग्रीन एक्सप्रेसकडे मोर्चा वळवला आहे. त्यानुसार देशातील मोठ-मोठी शहरं राजधानी दिल्लीला जोडली जाणार आहेत. त्यामध्ये मुंबई-दिल्ली या द्रुतगती महामार्गाचाही समावेश आहे. यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर १२ तासात पार करणे शक्य होणार आहे. पुढील वर्षभरात या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे गडकरी यांनी सांगितले. या या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च आला असून, येत्या एक दोन महिन्यात दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेचे उद्घाटन होईल, असेही त्यांनी सांगितले.
देशातील वायू प्रदूषण या ग्रीन हायवेच्या बांधकामामुळे कमी होनार आहेच पण त्याच बरोबर सुलभ रहदारी आणि लॉजिस्टिक्स तसेच वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई- दिल्ली प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या ४० तास लागतात. मात्र या महामार्गामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास कारने केवळ १२ तासांत पूर्ण होणार आहे. या मार्गाचे १३०० किमी मार्गावरील ६० टक्क्यांचं काम पूर्ण झाल आहे. पहिल्या टप्प्यात ८ पदरी आणि दुसऱ्या टप्प्यात १२ पदरी रस्ते महामार्ग निर्माण होईल. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत एक इलेक्ट्रीकल महामार्ग बोगदाही बनविण्यात येणार आहे. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या बांधकामावर सरकार ७ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
गडकरी म्हणाले, सरकारकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन अंतर्गत १११ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. दरम्यान, एक दोन महिन्यात दिल्ली-अमृतसर-कटरा प्रकल्पाचे काम सुरू होईल. दिल्ली-फरीदाबाद-सोहना एक्सप्रेस महामार्ग आणि अहमदाबाद-ढोलेरा महामार्ग प्रकल्प सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.