बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : देशभरात कोरोना महामारीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी ३० जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण देश गेले एक वर्ष कोरोनाच्या जाळ्यात अडकून पडला होता. ऑगस्ट -सप्टेंबरमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. आता जानेवारीमध्ये कोरोना लस आली असून संक्रमण होण्याच्या ग्राफ ७ महिन्यांच्या खालच्या स्तरावर पोहचला आहे. देशातील कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या आता दोन लाखांपेक्षा कमी आहे. ९७ टक्के लोक कोरोनामधून बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५४ लाख ७२ हजार कोरोना लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.
केरळमध्ये ३० जानेवारी रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये वुहानवरुन परत आलेले काही विद्यार्थी पॉसिटिव्ह आढळून आले होते. परंतु, तरीही कोरोना पॉसिटिव्हची संख्या दुहेरी अंकापर्यंत पोहचली नव्हती. ४ मार्च रोजी पहिल्यांदा देशात २२ कोरोना पॉसिटिव्ह आढळून आले. त्यातील १४ जण इटलीहून पर्यटक म्हणून आले होते. त्यानंतर १२ मार्चला देशातील पहिला कोरोनामुळे मृत्यु झाल्याचे समोर आले.
२५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हा देशभरात केवळ ६५७ कोरोना पॉसिटिव्ह केसेस होत्या. तेव्हा प्रथम २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परंतु, पुढील काही दिवसात कोरोना विस्फोट होईल यांची कोणाला कल्पना नव्हती. अचानक लॉकडाऊन केल्याने कोट्यावधी मजूरांच्या रोजी रोटीचा भयानक प्रश्न समोर आला.
एप्रिल महिन्यात परदेशातून दिल्लीत आलेल्या तबलिगी समाजाने कोरोनाचा फैलाव देशभर केल्याचा आरोप केला गेला. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या २३ टक्क्यांनी वाढली. १४ एप्रिलला देशातील रुग्णांची संख्या १ हजार झाली. त्यानंतर २५ एप्रिलला ही संख्या २० हजारांहून अधिक झाली.
१८ मे मध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख झाली. २ जूनला ही संख्या २ लाखांवर पोहचली. २६ जूनला देशातील कोरोना बाधितांची संख्या ५ लाखांवर गेली. १६ जुलैमध्ये ही संख्या १० लाखांवर आणि ६ ऑगस्ट रोजी ती २० लाखांच्या पुढे गेली. एकट्या ऑगस्ट महिन्यात २० लाख नवीन रुग्ण आढळून आले. १५ सप्टेंबरला तिने ५० लाखांचा टप्प्या पार केला. १६ सप्टेंबर रोजी देशभरात एकाच दिवशी तब्बल ९७ हजार ८५९ नवीन कोरोना बाधित आढळून आले. हा आतापर्यंतचा एकाच दिवसात सापडलेला सर्वात मोठा आकडा होता. त्यावेळी दररोज जवळपास ९० ते ९५ हजार नवीन रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर नवीन रुग्णांच्या संख्येत काहीशी घट होऊ लागली. ऑक्टोंबर महिन्यात नवीन रुग्णांमध्ये आणखी घट होऊ लागली. त्याचवेळी देशभरात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली.
तीन महिने सलग जवळपास २० लाख नवीन रुग्ण आढळल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात थोडासा दिलासा मिळाला. दररोज साधारण ३८ हजार रुग्णांची भर पडत होती. त्यापेक्षा अधिक रुग्ण कोरोनातून मुक्त होत होते.
आता जानेवारीत कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली असून नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. देश कोरोनातून बाहेर आला असून सर्व उद्योग व्यवसाय सुरु झाले आहेत. फेब्रुवारीपासून जवळपास सर्व निर्बंध दूर होण्याची शक्यता आहे.