मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मागील ४ दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार सुरु झाला आहे. कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफची टीम आणि नौदल अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. तर ठाणे, रायगड, पालधर य़ा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ओडीशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि मराठवाडा येथे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे महत्वाच्या शहरांत मान्सून अधिक सक्रीय होणार असल्याने अनेक गावांना आणि शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ३-४ दिवस महाराष्ट्रात रेड अलर्ट
पुढील ३-४ दिवस राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, तसेच कर्नाटकचा किनारी भाग, राजस्थान, गुजरात या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मुसळधार पावसामुळे कोकणातला पुर अद्याप कमी झालेला नाही. तसेच रायगड, सिंधूदुर्ग, या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरस्थिती आहे. येत्या चोवीस तासात रायगड पालघर येथे मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यांमध्ये महापुराचा धोका
रायगड जिल्हायातील महाड, आसनपोई, बिरवाडी या भागात महापुराचा धोका वाढला आहे. बिरवाडी आसनपोई येथील २०० पेक्षा अधिक लोकांना एनडीआरएफच्या टीमने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तर सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका आहे. तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे. आतापर्यंत सांगलीतील १०० पेक्षा जास्त गावांचा पुराचा धोका वाढला आहे. या ठिकाणच्या ४१ हजार लोकाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्येही राजाराम बंधाऱ्याची पातळी ५४ फुट १० इंच इतकी झाली आहे. ४३ फुटाची धोकायदायक पातळी या बंधाऱ्याने ओलांडली आहे. त्यामुळे एकूण १११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पुणे बंगळूरु महामार्गावरील वाहतुक सांगली नाक्याजवळ बंद करण्यात आली होती. त्यानंतर ती आता सुरळीत करण्यात आली आहे.