बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. 70 टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. पण जागरुक रहा, चिंता करु नका मात्र काळजी घ्या, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Tope)यांनी केले आहे. तसेच राज्यात करोनाच्या नव्या प्रकाराचे आठ रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नसल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आरोग्यमंत्री टोपे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे आपण सक्तीने पालन करत आहोत.
7 जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत. ज्या त्रुटी वाटत आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहोत. 8 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन करणार असून त्याच्यातून आपली यंत्रणा तपासली जाईल. यामध्ये काही त्रुटी वैगेरे आहेत का? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय आहे का? याचीही पाहणी होईल. ज्यावेळी आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवू त्यावेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा यादृष्टीने हे सर्व करणार असल्याचे टोपे म्हणाले.
राज्यात सध्या दिवसाला दोन ते अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. आधी दिवसाला 21 हजारापर्यंत रुग्ण सापडत होते. मृत्यूदरदेखील कमी झाला आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासंबंधी नियमावली केली होती. सात दिवस संस्थात्मक क्वारंटाइनची सक्ती केली होती. . रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घऱात क्वारंटाइन होण्यास सांगितलं होते. राज्याने काळजी घेण्यामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही, असे टोपे यांनी सांगितले. केंद्राला आपण इतर राज्यांनाही ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांबद्दल नियमावली तयार करण्यास सांगणार आहोत. जेणेकरुन ते रुग्ण त्या राज्यांमधून महाराष्ट्रात येऊ नयेत, असे टोपे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.