बहुजननामा ऑनलाईन टीम : प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणतात. याचा प्रत्यय गुजरातच्या वडोदरा येथील घटनेतून आला. येथील एका २३ वर्षीय ब्राह्मण मुलीने धर्म परिवर्तन करून मुस्लीम मुलाशी मुंबईच्या वांद्रे येथे मस्जिदमध्ये निकाह केला होता. परंतु, निकाहानंतर लव्ह जिहादवरून राजकारण चांगलेच तापले. येथील हिंदू संघटनांनी गदारोळ सुरु केला. ज्यानंतर गुजरातची एक टीम मुंबईला पोहचली आणि दोघांना घेऊन पुन्हा वडोदरा गाठलं, पोलिसांनी मुलगी आणि मुलाला आपापल्या घरी पाठवलं आहे.
दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत अनेक हिंदू संघटनांच्या नेत्यांनी मुलीच्या घरी भेट दिली, तेव्हा मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. आता निकाह करणाऱ्या मुलीचं म्हणणं आहे, की मी मुलाला हिंदू बनवते, मुलगी सध्या तिच्या वडिलांच्या घरी आहे. मी मुलाला गेल्या ६ वर्षापासून ओळखते, मित्रांच्या संपर्कात आल्याने आमची भेट झाली, त्यानंतर आम्ही वारंवार एकमेकांच्या संपर्कात आलो असं त्या मुलीचं म्हणणं आहे.
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं. त्याठिकाणी दोघांनी लग्न केलं. त्यानंतर १६ डिसेंबरला आम्ही परत वडोदरा येथे आलो, तेव्हा अनेक हिंदू संघटनांच्या नेत्यांनी माझी भेट घेतली आणि मला समजवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आता मी निर्णय घेतला मुलाला हिंदू धर्माचा स्वीकार करण्यासाठी सांगणार आहे.
दुसरीकडे या प्रकरणावरून हिंदू संघटना सक्रीय झाल्या. लव्ह जिहादवरून कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंदू जागरण मंचाचे नीरज जैन यांचे म्हणणं आहे, की मुस्लीम मुलं डाव आखून हिंदू युवतींना पळवून नेतात आणि जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करायला लावतात, त्यामुळे लवकरच लव्ह जिहादसाठी कायदा बनवणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितलं .
लव्ह जिहाद ९९ टक्के अपयशी ठरतात…
प्रेम विवाह ९९ टक्के यशस्वी असतात, पण लव्ह जिहाद ९९ टक्के अपयशी ठरतात. तर लव्ह जिहादचे पैसे परदेशातून येतात. जिथे कट्टर हिंदूच्या मुलींची किंमत ११ लाख रुपये आहे. ब्राह्मण ठाकूर आणि ओबीसी मुलींच्या वेगवेगळ्या किंमती निश्चित आहेत. तसेच, मदरसे व मशिदीमधून हे चालविले जाते, असा दावा साक्षी महाराज यांनी केला आहे. लव्ह हा एक चांगला शब्द आहे. लव्ह प्रेम विवाहाची परंपरा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हापासून सुरू आहे. यात कोणालाही आक्षेप नाही. मात्र, ज्यावेळी जिहाद जोडला जातो, त्यावेळी ते विषबाधा होते. लव्ह जिहाद हिंदूच्या मुलींना खोटी नावे ठेवून फसवणूक केली जाते. त्यांच्याकडून दहशतवादी जन्माला घातला जातो आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले जाते असं भाजपा खासदार साक्षी महाराज काही दिवसांपूर्वी म्हणाले.