बहुजननामा ऑनलाइन टीम –देशातील विरोधी पक्षांनी फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. या दरम्यान फेसबुकनं भाजपा नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी आता कारवाई केली आहे. टी राजा सिंह यांनी फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं फेसबुकनं त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर बंदी आणली आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजापाच्या धोरणांचं समर्थन करतंय असं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवरील अनेक भडकाऊ विधानं हटवली जात नव्हती. याच बातमीचा हवाला देत काँग्रेसह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्ला चढवला होता.
फेसबुकच्या प्रवक्त्यांनी ईमेलवर पाठवलेल्या निवदेनात म्हटलं आहे की, आम्ही आमच्या धोरणांचं उल्लंघन केल्याबद्दल राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे. फेसबुकद्वारे आमच्या व्यासपीठावर हिंसाचार, द्वेषबुद्धीस उत्तेजन देणं, द्वेष पसरवणं याला आमचं धोरण प्रतिबंध करतं. संभाव्य उल्लंघन करणाऱ्यांचे मूल्यांकन करणाऱ्यांची प्रक्रिया व्यापक असून या प्रक्रियेवर काम करीत असताना आम्ही राजा सिंह यांचं अकाऊंट फेसबुकवरून काढून टाकलं आहे असं या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असंही म्हटलं होतं की, फेसबुकची धोरणं भारत सरकारला पाठिंबा देतात. त्यानंतर भारताच्या विरोधी पक्षांनी फेसबुक आणि सरकारचं साटंलोटं आहे असा आरोप केला होता. भारत फेसबुकसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात त्याचे 30 कोटी युजर्स आहेत. या रिपोर्टमध्ये असा आरोपही करण्यात आला होता की, फेसबुकनं भाजपाचे आमदार राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केलं. तेव्हापासूनच सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस सोशल मीडिया कंपनीच्या कथित पक्षपातीपणाबद्दल वक्तव्य करत आहे.