बहुजननामा ऑनलाईन टीम : केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासाठी काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दिल्ली सीमारेषेवर आद्यप चालूच आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत सरकारशी चर्चा करूनही हाती काहीच लागले नाही. शेवटी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनास दिग्गजांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसंच, राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दर्शविला आहे. त्यावरुन भाजपाने शिवसेनचं शेतकरी प्रेम नकली असल्याचं म्हटलं आहे.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यासंदर्भात केलेलं ट्विट
बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॉग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत राज्य सरकारने कोरोना काळात केली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झालं. शरद पवारांचं कृषिमंत्री असताना पाठवलेले पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीले आहे. शरद पवारांनीच खासगीकरणाला सुरुवात केली.
शेतकरी आंदोलनाला दिग्गजांचाही मोठा प्रतिसाद
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास खेल रत्न पुरस्कार परत करू, असे विजेंदरसिंग यांनी जाहीर केले आहे. तसेच कंगना रानौत यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या शेरेबाजीला दिलजित दोसांझ यांनी दिलेल्या प्रत्युत्तराचे अनेक नामवंतांनी समर्थन केले आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे.
शेतकरी आंदोलनावर शिवसेनेने केलेलं भाष्य
शेतकऱ्यांना जे कृषी कायदे जुलमी वाटत आहेत, ते मागे घेण्यात सरकारलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. किंबहुना, तो मनाचा मोठेपणाच ठरेल. प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य या कठीण काळात दाखविले असते तर आजची कोंडी थोडी सैल झाली असती. आज परिस्थिती बिघडत चालली आहे. ही सरकारच्याच कर्माची फळे आहेत. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्याच हक्काने ते दिल्लीत ठामपणे आंदोलन करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी चर्चा करणाऱ्या सांगकाम्यांना याचे भान नाही.