चाळीसगाव बहुजननामा ऑनलाईन – बंजारा भटके विमुक्त समाजाचे प्रश्न तातडीने सोडविले नाहीत. तर हरपणी ब्रिगेड विद्यमान आमदारांना चोळी बांगडीचा ( फेटिया काचळी ) पेहराव भेट देणार असा निर्धार हरपणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा जिजा राठोड यांनी केला. भारत स्वतंत्र होऊन एवढी वर्षे उलटली तरी बंजारा व एकूणच सर्व भटके – विमुक्त जाती – जमातींवर शासकीय स्तरावरून सतत अन्याय -अत्याचार होत आहेत. शासनाकडून पदरात पडणारा सततचा दुजाभाव असह्य होऊन शासनाच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध बंजारा समाजातील महिलांनी एकजूट होऊन आता कंबर कसली आहे.
ज्या भटक्या – विमुक्तांत जाती-जमातींच्या मतदानांच्या बळावर आपण निवडून येता, लोकप्रतिनिधी म्हणून मिरवता, त्या बंजारा व भटके विमुक्त जाती – जमातींचे प्रश्नच आपणास अजून कळले नाहीत. चुकून कळले तरी जाणीवपूर्वकच आपण त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक करीत आहात, असा आरोप हरपणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा जिजा राठोड यांनी केला.
आपण या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजाने आम्हाला आमच्याकडे असलेले इतर सशक्त पर्याय वापरावे लागतील. ती वेळ येण्यापूर्वीच आपण सावध व्हा. नवीन शैक्षणिक धोरणात आपण उपरे ठरलो. नॉन क्रिमिलेअरचा प्रश्न आहेच. भटक्या – विमुक्त जाती – जमातींचे आरक्षण जवळजवळ संपुष्टात आलेले आहे. असेही त्या म्हणाल्या.भटक्या-विमुक्तांचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवून बंजारा समाजाला न्याय द्यावा.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा हरपणी ब्रिगेडच्या प्रमुख सल्लागार डॉ. संयोगिताताई नाईक होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, लघुद्योगाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण घडवून आणावे. बंजारा समाजाची पारंपारिक वेशभुषा टिकवून ठेवण्यासाठी बंजारा महिलांनी कसिदाकारीकडे वळावे. त्यांना औद्योगिक व तंत्र शिक्षण द्यावे. तसेच बंजारा महिलांनी सुध्दा आपल्या घरामध्ये शिक्षणाला महत्व देऊन आपल्या मुलांना बौध्दिक दृष्या सक्षम करावे असा संदेश दिला. तर हरपणी ब्रिगेडच्या लढवय्या कार्यकर्त्या तथा कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या नंदाताई मथुरे नाशिक यानी बंजाराना आदिवासीचा दर्जा देणे, क्रिमिलिअरची अट रद्द करावी. या विषयी चर्चा केल.
हरपणी ब्रिगेडच्या उपाध्यक्षा व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मिनाक्षीताई चव्हाण यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी सरकारने बिनफेडीचे कर्ज द्यावे. असे मत व्यक्त केले. हरपणी ब्रिगेडच्या प्रमुख संघटक व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सुजाताताई आडे धुळे यांनी वसंतराव नाईक महामंडळाची आर्थिक तरतुद वाढवून मिळण्याबाबत मार्गदर्शन केले. बंजारा व भटक्या विमुक्त जाती जमातींना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी अन्नपुर्णाताई राठोड यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.