मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी आज माध्यमाशी संपर्क साधताना म्हणाले राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लशींचा साठा आहे. तर केंद्राकडून लशींचा पुरवठा होत असला तरी त्यात वेग नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यावरून राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा. देशात सर्वाधिक लशीचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला जात आहे, असा घणाघाती टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला.
काय म्हणाले फडणवीस?
टोपेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, राज्य शासनामधील मंत्री आणि नेते कोरोना लसीकरणाबाबत करत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट (लक्ष्य) ग्रूपला आवश्यक इतक्या लशींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्र राज्यात दिल्या जात आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करावी. तसेच माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे आधी बंद झालं पाहिजे, अशा शब्दात घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सातही दिवस १०० टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र आहे. विकेंडला २ दिवस लॉकडाऊन आणि ५ दिवस कडक निर्बंध असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात सर्वच बंद करुन ठेवलं आहे. यामुळे राज्यातील लहान उद्योजक, छोटे व्यापारी आणि नागरिकांचा उद्रेक होईल याची काळजी सरकारने घ्यावी असा सल्ला सुद्धा फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळेच तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर हे कोरोना काळातलं अत्यंत महत्वाचं औषध असताना राज्य सरकारने यासंदर्भात तात्काळ कारवाई करायला हवी, काळाबाजार हा रोखला गेला पाहिजे, अशीही मागणी केली. अनेक जिल्ह्यांतील हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष केले आहे.