मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेनं कठोर पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीला पालिकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी स्पष्ट सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान मुंबईत बुधवारी 721 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली होती. 42 दिवसातील ही सर्वाधिक रुग्णवाढ ठरली होती. त्यामुळंच चिंता वाढल्याचं दिसत आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. नागरिकांनी जर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. इतकंच नाही तर स्थानिक पातळीवर जी सद्यस्थिती आहे त्यानुसार, प्रशासनानं निर्णय घ्यावेत असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं होतं. त्यानुसार अनेक भागात पुन्हा एकदा नियम कठोर करण्यात येत आहेत. मुंबईतही आज पालिका आयुक्तांनी याच अनुषंगानं बैठक घेतली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यानुसार आयुक्तांनी काही ठळक सूचना केल्या आहेत. त्यानुसार विवाह कार्यालाये, सभागृह आदी ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात व सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येण्यावर मर्यादा आणली गेली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात एकावेळी 50 पेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही असं आयुक्तांनी नमूद केलं आहे.
मास्क वापरण्यासह इतर नियमांचं पालन जर केलं नाही तर कठोर कारवाई करण्यात यावी असंही आयुक्तांनी सांगितलं आहे. जर कुणी नियमभंग केला तर वेळप्रसंगी गुन्हे नोंदवा असे निर्देशही देण्यात आले आहेत. आजपासून या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी असंही ते आवर्जून म्हणाले.
दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याआधी लॉकडाऊनचे संकेत दिले होते. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील असंही त्या म्हणाल्या होत्या.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जर हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील. रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असून मृत्यूचं प्रमाणंही दिसत आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.