मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक भागांमध्ये निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. संपूर्ण देशाचे लसीकरण करण्याची गरज नाही. त्याऐवजी लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा असा सल्ला सांळुंखे यांनी दिला आहे. आपण आजपासून 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे.
मात्र 18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण व्हायला हवे. गंभीर आजार असलेल्या 18 वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्याने लस द्यावी. तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल, असा मोलाचा सल्ला साळुंखे यांनी दिला. देशाची लोकसंख्या 135 कोटी, महाराष्ट्राची 12 इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरण करणे मोठे आव्हान असल्याचे म्हटले होते. पण मुळात इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरणाची गरज नाही. कोरोना स्थिती हाताळण्यात, लसीकरणात महाराष्ट्राला स्वायत्तता द्यायला असे साळुंखे म्हणाले.
मुंबई, पुण्यासारख्या शहरात दररोज 1 लाख लसीकरण व्हायला हवे, खासगी क्षेत्राची मदत घेतल्यास ते शक्य असल्याचे ते म्हणाले. गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या 18 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मागणी मी दीड महिन्यांपूर्वीच केली. आपली जीवनशैली पाहता अनेक तरुणांना देखील गंभीर आजार आहेत. पण त्यांना आपण लस देत नाही. यामागचा तर्क काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा केल्यास इतर राज्यांवर अन्याय होईल, हा युक्तिवाद साळुंखे यांनी खोडून काढला. इतर राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रासारखी नाही. त्यामुळे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातही संपूर्ण महाराष्ट्राऐवजी मुंबई, पुणे आणि रुग्ण संख्या अधिक असलेल्या शहरांना प्राधान्य द्यायला हवे असे ते म्हणाले.