लखनऊ : वृत्त संस्था – गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील अवस्थाही कोरोनामुळे बिकट झाली आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते डझनभरहून अधिक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. वाढत्या बाधितांच्या संख्येने संपूर्ण आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. अशातच एक म्हण हेलावून टाकणारी घटना लखनऊमध्ये घडली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे मदत मागूनही ती न मिळाल्याने एका मुक्त पत्रकारला जीव गमवावा लागला आहे. विनय श्रीवास्तव (वय ६५) असे त्यांचे नाव आहे.
शनिवारी विकास नगरमध्ये राहणाऱ्या विनय श्रीवास्तव यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ५२ वर असताना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयालाकडे मदत मागितली. मात्र कित्येक तास त्यांनी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ३१ पर्यंत पोहोचली. त्यांनी ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं. ‘तुमच्या राज्यात डॉक्टर आणि रुग्णालयं निरंकुश झाली आहेत. मी ६५ वर्षांचा आहे. मला स्पाँडिलायसिसचा त्रास आहे. माझ्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ५२ वर आली आहे. कोणतंही रुग्णालय, लॅब आणि डॉक्टर माझा फोन घेत नाहीत,’ असं त्यामध्ये त्यांनी म्हंटल होत. मात्र मदत न मिळाल्याने त्यांचं निधन झाल. त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
विनय यांचा मुलगा हर्षितनं व्यवस्थेवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले कि, बऱ्याचं रुग्णालयांमध्ये मी वडिलांना घेऊन गेलो. पण आधी कोरोना अहवाल आणा मगच उपचार केले जातील असे सांगण्यात आले. प्रत्येक ठिकाणी हेच उत्तर मिळत होते त्यांना कोरोना अहवाल यायला २४ तास लागतात माझ्या वडिलांना आताच दाखल करून घ्या, यासाठी डॉक्टरांकडे विनंती केली. पण कोणीही माझं ऐकलं नाही. अखेर त्यांचं उपचाराअभावी निधन झाल. सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांना मारून टाकलं,’ अशा शब्दांत हर्षितनं आक्रोश केला.