नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूंमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पण एक दिलासादायक बाब म्हणजे भारतीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली रुग्णांची आकडेवारी, ज्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचा आकडा भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील रुग्णांचा मृत्युदर 1.93 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 944 लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत 49,980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातल्या मृत्यूदराकडे पाहून असे लक्षात येते की, 156 दिवसात भारतात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अमेरिकेत 23 दिवसात 50 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझील मध्ये 95 दिवसात तर मेक्सिको मध्ये 141 दिवसात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्याने त्याचा फायदा होताना दिसून येत आहे. याच दरम्यान भारताच्या रिकव्हरी रेटमध्ये देखील सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सध्या कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या, म्हणून परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे रुग्ण लवकर सापडण्यास मदत होत आहे आणि मृत्युदर देखील कमी आहे. 15 ऑगस्ट दिवशी 7,46,608 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर आत्तापर्यंत 2,93,09,703 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
शनिवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 26 लाखांच्या जवळ जाऊन पोहचली आहे. मागच्या 24 तासात 63,490 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले असून 944 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 25,89,682 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 6,77,444 लोकांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत 18,62,258 लोक बरे होऊन घरी गेले आहेत.