पुणे: Chhagan Bhujbal | अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेत सामील केल्यामुळे भाजपाला (BJP) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राज्यात मोठा फटका बसला अशी मांडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुखपत्रातून करण्यात आली. अजित पवारांशी हात मिळवणी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या केडरमध्ये मोठी नाराजी उफाळून आली. त्यामुळे अजित पवारांना घेऊन फायदा नाही तर तोटा झाला, असं आरएसएसच्या मुखपत्रात लिहिण्यात आले होते. यावरून राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
याबाबत आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे, परंतु ४८ पैकी आम्हाला चार जागा लढवण्यासाठी दिल्या गेल्या, त्या पैकी दोन जागांवर उमेदवार आयात केले गेले होते आणि एक जागा भाजपाच्या सांगण्यावरून महादेव जानकर यांना देण्यात आली. म्हणून आमच्या पदरी दोन जागा आल्या आणि यामधील एका जागेवर विजय मिळाला. तरी पण आमच्या मुळे ४८ जागांवर परिणाम कसा झाला?
आम्ही मानतो की थोडं बॅकफूटवर आपण गेलो आहे. पण, हीच परिस्थिती इतर राज्यात पण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये इतक्या कमी जागा मिळतील असं वाटलं नव्हतं पण झालं. म्हणून फक्त अजित पवारांमुळे भाजपला फटका बसला, असं म्हणणं योग्य नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे.