बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे : महाराष्ट्रात गेले सहा महिन्यापासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. तर हे एक हवामानी संकट राज्यावर आले आहे. हवामानातील बदलामुळे उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे आणि विदर्भात ४ आणि ५ फेब्रुवारीला राज्यात ढगाळ वातावरण राहणार अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे याचा थंडीवर परिणाम होईल. असे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. तसेच राज्यात फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार घाटमाथ्यासह पुण्यात १ फेब्रुवारी ते ५ तारेखपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. तर कोरड्या हवामानामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अजूनही पाऊस सुरू आहे.
या पावसाळी वातावरणामुळे अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची जास्त शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. परंतु पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.