बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी स्वागत केले असून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. तसेच देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्य, आर्थिक आणि पायाभूत सुधारणांस विकास, नाविन्यता आणि विकास अशा सहा सूत्रांवर अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा, मासेमारीसाठी मोठी तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना 16 लाख कोटींचे आपत्कालीन कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद केली आहे. सर्व क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन कायदा लागू केला आहे. देशाच्या इतिहासात कामगारांसाठी घेतलेला क्रांतिकारक निर्णय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला.