बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, यात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असा निर्णय घेतला आहे. तर १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जयंतीबाबत आवाहन केलं आहे.
१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या निमित्त सरकार काय निर्णय घेणार यावर सर्वांचे लक्ष आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत सरकार काही नियमावली जाहीर करेल, असं सांगण्यात येत आहे. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीही करोनाचे प्रमाण अधिक असल्याने नियमाचे पालन करून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला आंबेडकरी जनतेचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. तर यावेळी पुन्हा आंबेडकर जयंती जवळ आली असताना राज्यात करोनाचं थैमान सुरू झालं आहे. त्यामुळे आता सरकार बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.