मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपामुळे ठाकरे सरकार आणि विरोध पक्षामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. यावर भाजपा नेते आमदार राम कदम यांनी घणाघाती आरोप केले आहेत. वाझे गँगला वाचवण्याचे काम ठाकरे सरकार करत असल्याची टीका आमदार कदम यांनी केली आहे.
राज्य सरकार वाझे गँगला वाचवण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली. वाझे गँगला वाचवण्यासाठी खोटे बोलण्याच्या सर्व परिसीमा पार केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे सरकारने मुर्ख समजू नये, अशी टीका आमदार कदम यांनी केली आहे.
दरम्यान खरंच स्वतःची चामडी वाचवण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात?, थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा. देशमुखांना वाचवायचे असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय. 15 फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते का ? कितीही झाकल तरी सत्य लपणार नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है, असे सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली आहे.