पुणे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, आज (मंगळवार) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंदला विरोधी पक्षांनी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज पुण्यात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये व्यापारी संघटनांनीदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आले होते.
राजकीय पक्षांनी केलेल्या आवाहनानंतर पुण्यातील व्यापारी संघटनांनी सुरुवातीला या बंदमध्ये सहभागी होण्यास नकार देत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु आदोलकांचा मोर्चा पुण्यातील अलका चौकातून महात्मा फुले मंडईकडे जाणार असल्याने किमान दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी सकाळी घेतला. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी टीका करत धमकी वजा इशारा दिला आहे.
अंकुश काकडे म्हणाले की, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका याची नोंद घ्यावी की, त्यांच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा महाआघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशा शब्दांत त्यांनी धमकी वजा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या प्रकल्पासाठी पाच हजार एकर जागा मिळवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे असे सांगत, त्या उपकाराची जाणीव व्यापाऱ्यांना नसल्याचे काकडे म्हणाले.
फत्तेचंद रांका यांनी पत्रक काढले की, आम्ही आमची दुकाने उघडी ठेऊ; पण तुमच्या मोर्चाला पाठिंबा देऊ. त्यावर मी म्हटले की, आम्हाला व्यापाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज नाही. तुमचा जर शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा होता तर चार तास दुकानं बंद ठेवायची होती. पण तुम्ही चार तास दुकानं बंद ठेऊ शकत नाही. फत्तेचंद रांका यांनी नोंद घ्यावी, की तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा महाआघाडी सरकार तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी बैठक घेतली. शहराच्या बाहेर पाच हजार एकरांमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या उपकाराची जाणीव व्यापाऱ्यांना नाही. मी सगळ्या व्यापाऱ्यांबद्दल बोलत नाही, तर व्यापाऱ्यांच्या नेत्याबद्दल बोलतोय, असेही अंकुश काकडे यांनी म्हटले आहे.