पुणे : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व स्वप्नपूर्ती सेवाभावी संस्था यांच्या वादाचा फटका प्रशिक्षणार्थी उमेदवारांना बसला. संस्था व बार्टी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रशिक्षणार्थी उमेदवारांना ऐन परीक्षांच्या कालावधीत मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर उमेदवारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर बार्टीने संस्थेला रक्कम न देता थेट उमेदवारांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेत हा प्रश्न मिटवला.
अनुसचित जातीच्या युवक-युवतींना बार्टीतर्फे स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी 4 महिने कालावधीचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला होता. त्यात खासगी संस्थेच्या माध्यमातून कोचिंग क्लासेस, भोजन व निवासाची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी लेखी परीक्षा घेत, 50 जणांची निवड करण्यात आली. त्याचे काम बार्टीने स्वप्नपूर्ती संस्थेला दिले होते.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून बार्टीने संस्थेला भोजन, निवास, कोचिंग क्लासची रक्कम दिली नाही. त्याचा परिणाम म्हणून संस्थेने उमेदवारांना खोली तत्काळ खाली करण्याचे आदेश दिले. तसेच भोजनाची व्यवस्था उमेदवारांनी स्वत:च करावी, असे संस्थेने उमदेवारांना सुनावले. त्यावरून उमेदवारांपुढे मोठे प्रश्न निर्माण झाले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या ह्या उमेदवारांवर अन्याय होत असताना, त्यादृष्टीने संस्था अथवा बार्टीने कोणतेच पाऊल न उचलल्याने उमेदवारांचे जगणे मुश्किल झाले. त्यामुळे या उमेदवारांनी जेवण न करता बार्टीच्या कार्यालयाकडे धाव घेतली.
“बार्टीने प्रशिक्षणाचे मानधन न दिल्याच्या कारणावरून गेल्या पंधरा दिवसांपासून संस्थेकडून खोली खाली करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. भोजनासाठी चालत दत्तवाडी येथे जावे लागते. तेथेही आता भोजन दिले जात नाही. पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे. याच कालावधीत संस्था व बार्टी यांच्यातील वादामुळे आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया एका प्रशिक्षणार्थीने बार्टीच्या कार्यालयासमोर दिली.
दरम्यान, बार्टीने निवास, भोजन व क्लासचे मानधन दिले नाही. त्यामुळे उमेदवारांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र, हा प्रश्न आता मिटला असून, आता कोणतीही समस्या नसल्याचे स्वप्नपूर्ती सेवाभावी संस्थेकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात बार्टीचे प्रकल्प संचालक वसंत रामटेके म्हणाले, शहानिशा करण्यासाठी संस्थेकडून माहिती मागविली. मात्र, संस्थेने त्यास कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांचे मानधन थांबविले. मात्र, यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.