औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. जलील यांच्याविरोधात बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी याचिका दाखल केली आहे.
बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख करीम यांनी लोकसभा निवडणुकीत जलील यांनी धर्माच्या नावावर मते मागितल्याचा आरोप केला आहे . तसेच जलील यांची निवड रद्द करावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काय आरोप केले ?
‘एआयएमआयएम’ नेते इम्तियाज जलील यांनी हिंदू-मुस्लिम समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, धर्माच्या आधारे मतदानाचे आवाहन केले होते.
नदीम यांनी तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांची ‘व्हिडिओ क्लीप’ याचिकेसोबत जोडल्या आहेत.
तसेच जलील यांनी नामनिर्देशनपत्रासोबतच्या फॉर्म नंबर-२६ मध्ये खोटी माहिती सादर केली आहे.
जलील यांनी मुस्लिम धर्माच्या नावावर ‘व्हॉटस्अॅप’ ग्रुपवर मतदान करण्याचे आवाहन केले होते.
जलील यांच्या सहकाऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील मशिदींमध्ये बैठका घेऊन जलील यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.
जलील यांनी १० ते १६ एप्रिल २०१९ दरम्यान धनादेशाऐवजी रोखीने ८२ हजार १२० रुपये रोख खर्च केले होते. हे निवडणूक नियमाविरूद्ध असल्याचे नदीम म्हणणे आहे.