पुणे : बहुजननामा ऑनलाइन – अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि उत्तम दर्जाचे शिक्षण या पाच गोष्टींवर आमची एल्गार परिषद ( Elgar Parishad) होणार आहे. या परिषदेला विनाकारण बदनाम करण्यात आले असून परिषदेला परवानगी नाकारल्यास रस्त्यावर घेऊ, असा इशारा माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील ( B G Kolse Patil ) यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा दिन आणि लोकशाही आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिद्धार्थ दिवे, सागर आल्हाट, गणपत भिसे, आकाश साबळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोळसे पाटील पुढे म्हणाले, जातीयवाद आणि धर्मांध बाजूला ठेवून पाच मुद्यांवर आम्ही एल्गार परिषद घेत असतो. या परिषदेचा आणि कोरेगाव भीमा घटनेचा काही संबंध नाही हे तपासातून पुढे आले आहे, असे असताना ही एल्गार परिषद बदनाम केली जात आहे. दरवर्षी आम्ही 31 डिसेंबर रोजी एल्गार परिषद घेत असतो. यावर्षी ही परिषद झाली नसली तरी आम्ही 30 जानेवारी रोजी ही परिषद गणेश कला क्रीडा मंच येथे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेथे आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ही परिषद घेऊ, असा इशारा ही त्यांनी या वेळी दिला.
अन् सिक्युरिटी काढून घेतली
2017 साली माझ्या आणि पी बी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एल्गार परिषद झाली. त्यावेळी झालेल्या गोंधळामुळे मला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिक्युरिटी दिली होती. महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शपथ घेण्याच्या दिवशीच माजी सिक्युरिटी काढून घेतली आहे. सरकार कोणते ही असले तरी काम करणारी यंत्रणा महत्त्वाची असते.