मॉरिशस : बहुजननामा ऑनलाईन – ‘अण्णा भाऊ साठे हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्याप्रमाणेच इतिहासाचे एक चकाकणारे पान आहे. अण्णा भाउंनी देवाच्या मालकीचे जग हे माणसाच्या मालकीचे केलं, ही त्यांच्या विचारांची मोठी ताकद आहे’ असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले. ते काल फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार संमेलन भोर आणि मराठी भाषक संघ,मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशस येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. मॉरिशसमध्ये अण्णाभाऊ साठे अशी जयंती अशा प्रकारे साजरी ही पहिलीच आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोतापल्ले होते. कार्यक्रमाची सुरुवातीला नाशिकच्या स्वप्ना थोरात यांनी ‘बुद्ध कबीर भीमराव फुले’ हे गीत सादर केले तर प्रा. डॉक्टर निशा भंडारे यांनी ‘माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली’ या अण्णा भाऊंच्या छक्कड वर अभिनय सादर केला. अण्णा भाऊंना नीट समजून घेऊन कृती करण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन कोत्तापल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. तर कार्यक्रमाचा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले. यावेळी ६० पेक्षा जास्त अभ्यासक उपस्थित होते.