पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कॉँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढीबाबत ट्विट करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार सध्या पेट्रोलचे दर शंभरीवर पोचले असतानाही गप्प असल्याने त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे विधान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, नानांच्या मनात आले, ते त्यांनी बोलून दाखविले. ते एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना जे योग्य वाटले, ते त्यांनी बोलून दाखविले, अशी सावध भूमिका पवार मांडली आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची गाडी तब्बल 35 लाखाची होती. चौकशीअंती एका उद्योगपतीने पोलिसांच्या कॅन्व्हायसाठी दिलेल्या गाड्यांपैकी काही गाड्या वरिष्ठ पोलिस अधिकारी वापरत असल्याचे समोर आले. उद्योगपतीने दिलेली गाडी ड्युटीवर असताना वापरणे योग्य नाही. डयुटीवर असताना शासनाच्या नियमांचे आदर व पालन केलेच पाहिजे, असे पवार म्हणाले. दरम्यान शिवसेनेने पुणे महपालिका बरखास्त करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. यावर पवार म्हणाले की, सरकार व महापालिका या दोन्ही वेगवेळ्या यंत्रणा आहेत. त्यांनी कस काम करावे हा त्यांचा अधिकार आहे. पालिकेने जर त्यांना घालून दिलेल्या नियमांच्या बाहेर काम केले असेल तर अशावेळी नगरविकास विभागाला जाब विचारण्याचा अधिकार सरकारला आहे. भ्रष्टाचाराचे पुरावेच समोर आले तर तशी चौकशी होईल, असे ते म्हणाले.