बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शनिवारी (दि. 6) इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर होते. यावेळी कायर्क्रमादरम्यान अजितदादांचे भाषण सुरू असताना अचानक अजान सुरू झाला, त्यामुळे ते मध्येच थांबले अन् अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावर जोरदार टीकास्त्र सोडल आहे.
शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या आतापर्यंत चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या, पण त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. शेतक-याच्या वाटेवर खिळे मारत आहेत, काही जनाची नाही, तरी मनाची आहे का नाही? सरकार लोकशाहीमध्ये ठोकशाही करत आहेत. माध्यमांनी उचलून धरल्यावर खिळे काढावे लागले आहे. भाजपचा एकही नेता शेतकऱ्याच्या बाजूने बोलत नाही, असे पवार म्हणाले.
तसेच इंदापूरकरांनो आमच्या हातात सत्ता द्या, त्यांच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवतो. नाही दाखवले तर अजित पवार नाव सांगणार नाही, असे आवाहन पवारांनी केले आहे.
निर्व्यसनी राहण्याचा सल्ला अन् एकच हशा
यावेळी कायर्क्रमात कार्यकर्त्यांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला देताना पवारांनी जोरदार बॅटिंग केली. एक बाटली तोंडाला लावली की आपण खलासच करतो, फक्त पाण्याची, असे पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला.