मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ( Anvay Naik Suicide Case) आरोपी असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic Tv Chief Arnab Goswami ) यांनी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यास व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यास स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गेल्याच वर्षी अलिबाग पोलिसांनी हे प्रकरण बंद केले असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश देण्याचा अधिकार नाही, असा दावा गोस्वामी यांनी या अर्जात केला आहे. नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी आरोपी असून गेल्याच महिन्यात त्यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राज्य सरकारने आकसापोटी बंद केलेल्या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याचे आदेश दिले. ए’ समरी अहवाल सादर केला असताना आणि विशेषतः मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी तो स्वीकारला असताना फेरतपास करण्याचे आदेश देण्याचा अधिकार गृहविभागाला नाही किंवा अन्य कोणत्याही विभागाला नाहीत, असे गोस्वामी यांनी याचिकेत म्हटले आहे.
सीआयडीचा तपास बेकायदेशीर : गोस्वामी
गेल्या महिन्यात गृहमंत्री देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन गोस्वामी यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करू, असे जाहीर केले. याचा अर्थ राज्य सरकार या तपासात हस्तक्षेप करत आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय फेरतपासाचे आदेश देऊ शकत नाही. त्यामुळे सीआयडी करत असलेला तपास बेकायदेशीर आहे, असे गोस्वामी यांनी याचिकेत नमूद केले. एफआयआर रद्द करण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी. तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यास व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणीही गोस्वामी यांनी न्यायालयाला केली आहे.