पुणे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोफत असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले होते. पण सध्यातरी असा कुठलाही निर्णय झाला नाही. महाविकास आघाडी एकत्र बैठकीत मोफत लसीकरणाचा निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान यावेळी त्यांनी लॉकडाऊन वाढवणार का? यावर देखील भाष्य केले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेतला जाणार आहे. त्यात ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.
पुण्यात कात्रज येथील कोविड सेंटरच्या उदघाटनासाठी पाटील आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लसी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. सर्वांना लस मिळण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल. अडचणी न येता सर्वांना लस सहज मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत राज्य सरकार नियोजन करत आहे. राज्याला जगभरातून कोरोनासाठी लागणाऱ्या आरोग्यविषयक वस्तू खरेदीचे अधिकार आहेत. ऑक्सिजन पुरवठा अगदी काठावर आहे. त्यातून रेमदडेसीविरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. ते इतर राज्यांकडून मिळवण्याचे प्रयत्नही चालू असल्याचे ते म्हणाले आहेत.
दरम्यान पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे झालेल्या गर्दीचा परिणाम आता जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांत पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यावर पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगाने मुदतवाढ द्यायला हवी होती. नागरिक एकत्र आल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता होती. आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळता आला असता असे ते म्हणाले.