नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात यंदाच्या कोरोनाच्या महामारीला निवडणूक आयोगाचं जबाबदार असल्याचं म्हणत मद्रास हाय कोर्टाने सुनावणी वेळी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. त्यावेळी म्हणाले की, निवडणूक असलेल्या राज्यामध्ये अनेकांच्या सभा होत होत्या त्यावेळी तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होता काय? असा प्रश्न देखील काल उपस्थित केला होता.
यावरून आता निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निर्णय घेत २ मे रोजी होणाऱ्या ४ राज्यासह १ केंद्रशासित प्रदेश निकालादरम्यान विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
मद्रास हाय कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारल्यामुळे आता आयोगाने निकाला वेळी विजयी मिरवणूक काढू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत आता निवडणूक आयोगाकडून असा आदेश काढण्यात येणार आहे.
काय म्हणालं होतं मद्रास हाय कोर्ट?
मद्रास हाय कोर्टाचे न्या. संजीब बॅनर्जींनी काल झालेल्या सुनावणीदरम्यान म्हणाले की, राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी दिलीत. कोर्टाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभांमध्ये फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम यांचे नियम धाब्यावर बसवले गेले, याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच, निवडणूक प्रचारसभा सुरू असताना तुम्ही कोणत्या जगात होतात, असा सवाल करत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला.
मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची रूपरेषा सादर करा. नाहीतर २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारा सुद्धा दिला आहे. देशातील जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं आणि घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागते ही बाब दुर्दैवी आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे. तो त्यांना लोकशाहीनं दिला आहे. मात्र, जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना हा अधिकार बजावता येईल. असे मद्रास हाय कोर्टाने म्हटलं आहे.