बहुजननामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सिंग यांनी केलेल्या आरोपाची हवाच काढली होती. देशमुखांना पोलीस अधिकारी भेटल्याची वेळ चुकीची होती. देशमुख त्यावेळी क्वारंटाईन होते, असे पवार म्हणाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, जेंव्हापासून सिंग यांची बदली झाली आहे, तेंव्हापासून ते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. ते असे का करत आहेत, हे समजत नाही. ते दिल्लीला जाऊन कोणाले भेटले हे देखील आम्हाला माहित आहे. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, करेक्ट वेळेवर सारे उघड केले जाईल, असे मलिक म्हणाले.
मलिक यांनी देखील पोलीस अधिकारी देशमुख यांना भेटल्याचा आणि पत्रकार परिषद घेतल्याचा भाजपाचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. देशमुखांना 15 फेब्रुवारीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तेंव्हा हॉस्पिटलबाहेर काही पत्रकार होते. त्यांना देशमुखांशी बोलायचे होते. देशमुखांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी एक खूर्ची घेतली आणि तिथे बसले, तेव्हा पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला, असे मलिक म्हणाले. देशमुखांनी कोणतीही पत्रकार परिषद बोलावली नव्हती. त्यानंतर त्यांनी चार्टर्ड फ्लाईटने मुंबई गाठली आणि घरी 27 तारखेपर्यंत क्वारंटाईन झाल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.