बहुजननामा ऑनलाइन – शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेला यश आलं असतानाच पुन्हा वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेत भर पडत आहे. अशात शहरामधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुरळीत झाली असली, तरी अजूनही शहराची लाईफलाईन समजली जाणारी लोकल नागरिकांसाठी सुरु झाली नाही. ही लोकल सेवा कधी सुरु होईल, याबाबतचे संकेत (aaditya thackeray)पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे(aaditya thackeray) यांनी दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आता फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकल प्रवासाची परवानगी असून, त्यांची वाढती संख्या लक्षात घेता आता लोकल गाड्या वाढवण्याची गरज आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत चर्चा सुरु आहे. लोकलची संख्या वाढवल्यावर अधिक जणांना परवानगी दिली जाईल. नाहीतर प्रवासाच्या इतर साधनांवरील ताण वाढेल.’
सर्व सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा कधी सुरु होईल, असे सातत्याने विचारले जात असताना त्याबाबत आदित्य ठाकरेंनी संकेत देत, ‘ऑक्टोबरच्या मध्यावर लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या आणखी काही सुविधा सुरु करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे. आम्ही अनेक गोष्टी थोडा वेळ घेऊन विचारपूर्वक सुरु करत आहोत. कारण एकदा सुरु केलेल्या सुविधा परत बंद करायच्या नाहीत,’ असे आदित्य यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला बोलताना म्हटलं.
तसेच ‘मुंबईत विविध प्रकारची कार्यालये आहेत. त्यांच्या वेळा बदलण्याचं काम अवघड आहे. सध्या आम्ही विविध कार्यालये, संकुल आणि कॉर्पोरेट संबंधित कामाच्या वेळांत बदल करण्याविषयी चर्चा करत आहे. कार्यालय २४ तास सुरु ठेवण्याच्या दृष्टिने आमचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काळातच नव्हे, तर नंतरही प्रवासी वाहतुकीवरील भार, वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, शहरातील कोरोना संसर्गित रुग्णांचा आकडा २ लाखांच्या वरती गेला आहे. सद्य स्थितीला मुंबईत २६ हजार ६६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६७ दिवसांवर गेलं आहे. आजतागात १ लाख ६४ हजार ८८३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहचलं आहे.