मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भूमिहीन, बेघर भटके विमुक्त, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास, दुर्बल घटकांतील मजुरी कामावर उदरनिर्वाह करणाऱ्या दगड खाण कामगारांच्या विविध मागण्यांचे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहेत. याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी गेल्या ३ दिवसांपासून दगडखाण असंघटित कामगार विकास परिषद, महाराष्ट्र यांच्यातर्फे ८०० कामगार कुटुंबिय आझाद मैदानात आंदोलनासाठी आले आहेत. परंतु काही तोडगा सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे जर आज मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उद्यापासून मंत्र्यांचा घरी घुसू असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सरकार हे खाणकामगाराच्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष्य करत असल्याचे त्यांनी बोलले या मोर्चात अॅड. बी. एम. रेंगे यांच्यासह दगडखाण कामगार सहभागी झाले होते. भूमिहीन, बेघर, मागासवर्गीय दगडखाण कामगारांना हक्काचे घर मिळावे, रेशनकार्ड नियमित करावित, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, जातीचे दाखले मिळावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शासकीय भूखंडावरील दगडाच्या खाणीचे परवाने कामगारांच्या सहकारी सोसायट्यांना देण्यात यावेत, शासकीय जमिनीवरील बंद पडलेल्या खाणींचा भूखंड खाण क्षेत्रातील कामगारांचे पुनर्वसन व पर्यायी रोजगार निर्मिती करण्यात यावी आदी मागण्यांबाबतचे प्रस्ताव सरकारकडे केले आहेत. मात्र सरकारकडून फक्त चर्चा होते. दोन दिवसांपूर्वीही मंत्रालयात चर्चा झाली पण तोडगा नाही. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व कामगारांचा मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरुपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा कामगारांनी दिला.