बहुजननामा ऑनलाइन टीम : शिकारीसाठी जंगलात गेलेल्या एका मित्राला चुकून गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याच्यासोबत शिकारीला गेलेल्या मित्रांना त्याच्या मृत्यूचे दु:ख सहन झाले नाही. म्हणून तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष असे गोळी लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पंकज, अर्जुन आणि सोबन अशी आत्महत्या केलेल्या मित्रांची नावे असून सर्वजण 18 ते 22 वयोगटातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टिहरी जिल्ह्यातील सात मित्र शनिवारी रात्री शिकारीसाठी जंगलात गेले होते. या मित्रांच्या गटाचे नेतृत्व राजीव हा करत होता आणि त्याच्याकडेच गोळ्यांनी भरलेली बंदूक होती. जंगलातून चालताना राजीवचा पाय घसरून तो खाली पडला. त्यावेळी त्याच्या खांद्यावरील बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यातून निघालेली गोळी संतोष नावाच्या मित्राला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वच मित्र घाबरले. राजीव बंदूक घेऊन पळून गेला. शिकारीला गेलेले पंकज, अर्जुन, सोबन या तिघांना संतोषचा मृत्यू आपल्याच चुकीमुळे झाल्याची अपऱाधाची भावना निर्माण झाली. त्यामुळे किटकनाशक पिऊन या तिघांनी आत्महत्या केली. तसेच राहूल आणि सुनील हे दोघेजण गावात येऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी किटकनाशक प्यायलेल्या 3 तरुणांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पंकज, अर्जुन आणि सोबनला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवले असून पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.