मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गेल्यावर्षी प्रमाणेच साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने गुरुवारी (दि.29) सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता फक्त ध्वजारोहण करावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण करावे. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच यावेळी सामाजिक अंतर, मास्क आदी कोरोना नियमांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने 13 एप्रिल 2021 च्या आदेशान्वये 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. या तरतुदी विचारात घेऊन महाराष्ट्र स्थापनेचा 61 वा वर्धापनदिन साधेपनाने साजरा करावा अशा सूचना दिल्या आहेत. नमूद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे तिथे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे सीईओ आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित रहावे. तसेच कवायती, संचलनाचे आयोजन करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. विधीमंडळ, उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांत कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करावे, अशा सूचना केल्या आहेत.