पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना च्या काळात ऑनलाइन सुविधेचे महत्त्व नागरिकांना जाणवू लागले आहेत. नागरिकांना ७/१२ उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये, यासाठी डिजिटल ७/१२ उपलब्ध करून दिला आहे. महसूल विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाइन उपलब्ध ७/१२ उतारा, फेरफार आणि खाते उताऱ्याबरोबर आता नागरिकांना घरबसल्या वारसनोंद तसेच तक्रार अर्ज दाखल करता येणार आहे. याबाबत सुविधा राज्य महसूल विभागाकडून ऑनलइन उपलब्ध करून देण्यात आलीय.
कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जाऊन हेलपाटे मारावे लागू नये, अशी शासनाची भूमिका आहे. यावरूनच सरकारने वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदीसाठी ई हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. सोमवार (ता. २४) रोजी महाराष्ट्रात ही सुविधा सुरू केले जाणार आहे. या सुविधेवरून वारस नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
या दरम्यान, मयत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी या संकेतस्थळावर अथवा pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिंग करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील. तसेच महत्वाची बाब शेतकऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. कर्जाच्या बाबतीत अर्थात कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनींवर बोजा चढविणे किंवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बॅंका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो. तो आता कमी होणार आहे. ई-हक्क’ ही प्रणाली सुद्धा बॅंकांना उपलब्ध होणार आहे. म्हणून ७/१२ उताऱ्यावर बोजा टाकणे किंवा काढण्यासाठी बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे.
उपजिल्हाधिकारी तथा ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले, वारसनोंद, तक्रार अर्ज यासाठी ई हक्क प्रणाली ही सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या कामांसाठी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. सोमवारपासून राज्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
काय होणार नागरीकांना फायदे ?
> हस्तलिखित वारस नोंदवही आणि तक्रार नोंद वही बंद होणार
> या कामासाठी तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करता येणार.
> केवळ जबाब देण्यासाठीच तलाठी कार्यालयात जावे लागणार
> ऑनलाइनमुळे तलाठी स्तरावर पेंडन्सी कळणार
> आवश्यक कागदपत्रे जोडल्यास १५ दिवसांत वारस नोंद
> त्यापुढील १५ दिवसांत फेरफार नोंद होणार.