मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीमधील जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध देशभरात होत आहे. तसेच काल गेट वे ऑफ इंडिया येथेही आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान एका तरुणीने ‘फ्री काश्मीर’ नावाचे पोस्टर दाखवले आहे. त्यावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे संजय राऊत यांनी त्या पोस्टरबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत पोस्टरचा वेगळा अर्थ घेऊ नये, असे म्हणाले. केंद्र सरकारने काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लादले असून तिथले इंटरनेट, मोबाइल सेवांसह अनेक सेवा बंद केल्या आहेत. त्याच निर्बंधातून काश्मीरला मुक्त करावे, असा उद्देश या पोस्टरबाजी मागे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची गोष्ट कोणी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले.
रात्रीच्या अंधारात चेहरे झाकून चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर हल्ले करतात, असे संजय राऊत यांनी जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले. तसेच गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या आंदोलनाची जागा बदलली असून आंदोलकांवर पोलिसांनी कोणतेही बळ दाखवले नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
आंदोलनात झळकलेल्या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच फडणवीस यांनी कारावाईची मागणी करत मुंबईत नेमके कशासाठी आंदोलन केले जात आहे? फुटीरतावादी लोकांना मुंबईत थारा का दिला जात आहे? असे अनेक प्रश्न त्यांनी केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरू असलेले हे देशविरोधी आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? चंद्रकांत पाटील यांनीही पोस्टरवर आक्षेप घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात काश्मीरला वेगळे करणारे बॅनर झळकावण्याच्या घटनेचा तीव्र निषेध असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी अशा प्रवृत्तींना ठेचले असते, असे ट्विट त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून सगळी चौकशी करून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी. सत्तेच्या लालसापोटी मौन बाळगू नये, असे आवाहन पाटील यांनी केले.