नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज देशाचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मुलींच्या लग्नाच्या वयात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांचे लग्नाचे वय बदलण्यात येईल, याबाबत सीतारामन यांनी म्हटले आहे. यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्पीय भाषणात मुलींचे विवाह, त्यांचे पोषण आणि आरोग्याबाबत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आधी वयाच्या 15 व्या वर्षी मुलींचे विवाह होत असत. 1978 मध्ये शारदा कायदा लागू करून त्यामध्ये बदल करण्यात आला. यानंतर मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे करण्यात आले. मुलींच्या शारीरीक पोषणाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला होता. याच अनुषंगाने सरकारकडून एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाकडून अहवाल आल्यानंतर मुलींच्या विवाहाच्या वयाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
अर्थमंत्री म्हणाल्या, बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजनेला खुप चांगले यश मिळाले आहे. या योजनेमुळे शाळेत जाणार्या मुलींचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण मुलांपेक्षाही जास्त आहे. आज मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत. तसेच पोषणाशी संबंधित योजनांवर 35 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मातांच्या आरोग्यासाठी आणि मुलांसाठी पोषण आवश्यक असते. याबद्दलची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत. सहा लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका पोषण अभियानावर काम करत आहेत.