कर्जत : बहुजननामा ऑनलाईन – कर्जत-जामखेड मतदार संघातील उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कर्जत तालुक्यातील राशीन येथे उदयनराजे भोसले यांनी सभा घेतली. त्यावेळी उदयनराजे यांनी राष्ट्रवादी- काँग्रेसवर अनेक टीका केल्या त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पन्नास वर्षे सत्ता दिली. राज्यातील अनेक प्रश्नांचा त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला. सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून जनतेला झुंजवले. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले, असा त्यांनी आरोप केला.
सभेमध्ये उदयनराजे यांनी जनतेला आवाहन केले की, भाजपचे नेते, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी कृष्णा खोरेचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले होते. त्यांचे दुष्काळी भागाला पाणी देण्याचे ध्येय होते. त्यानंतर पुन्हा सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने हे काम १५ वर्षे बंद पाडले. केवळ त्यांनी घोषणाच केल्या. कृष्णा खोरेचा प्रकल्प बंद पाडला. पैसा मात्र मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. हा पैसा कुठे गेला ? असा प्रश्न त्यांनाच विचारा. अनेक वर्षांच्या सत्तेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अहंकार निर्माण झाला होता. त्यांनी कधी जनतेचा विचार केला नाही. दुष्काळी भागाला पाणी देता येईल का ? बेरोजगारांना रोजगार देता येईल का ? याचा विचार त्यांनी केला नाही. यामुळे राष्ट्रवादीवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे. राम शिंदे यांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केले. त्यांनी प्रत्येक वेळी समाजाचे हित जोपासले. फक्त जनतेच्याच प्रश्नाचा विचार केला. त्यामुळे याही वेळी त्यांनाच बळ द्या असे उदयनराजे म्हणाले.
त्यानंतर कर्जत-जामखेड मतदार संघातील उमेदवार राम शिंदे म्हणाले की, मतदार संघातील महिलांना बचत गटामार्फत काम दिले जाईल. फाईव्ह स्टार एमआयडीसी उभारणार. दुष्काळी भागाला कुकडीचे पाणी देण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले आहेत. अजून काही भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देणार आहे. सध्या पैशाच्या जोरावर निवडणूक सुरू आहे. आमच्या गरिबीची चेष्टा करु नका. हा मतदार विकासाला मत देणारा आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
Visit : bahujannama.com