सातारा : बहुजननामा ऑनलाइन- शिवेंद्रसिंहराजे, विधानसभा परिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाने चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षात असताना न जुळलेली त्या तिन्ही राजांची सूत भाजप पक्षात तरी जुळणार का ? असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे. उदयनराजे भोसले यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . पुरग्रस्तांच्या प्रश्नासाठी ही भेट असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे. परंतु ते भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या या भेटीमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना मतदान करणारे तसेच विरोधक यांच्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
यासंदर्भात कार्यकर्त्यांनादेखील काय बोलावे , हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे उदयनराजे हे नेहमीप्रमाणे चकवा देत आहेत कि, राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी हे केले जात आहे. अशी चर्चा रंगली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीत उदयनराजेंना कंटाळून सोडचिट्ठी देणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे तसेच रामराजे निंबाळकर यांची पुन्हा राजकीय अडचणींना सामोरे जावे लागणार का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. उदयनराजेंवर दाखल करण्यात आलेले खंडणी प्रकरण तसेच सातारा पालिका निवडणुकीनंतर या तिघांतील संघर्ष चांगलाच चर्चेत आला होता.
एकमेकांवर टोकाचे आरोपच न करता हे प्रकरण हातघाईवर आले होते. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार उदयनराजेंविरोधात उभे होते. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरही सगळ्यांनी बहिष्कार टाकला होता. एवढेच नाही तर त्यांना खासदार पदासाठी तिकीट न मिळावे म्ह्णून टोकाला जाऊन विरोधही दर्शविला होता. परंतु राष्ट्रवादी पक्ष प्रमुख शरद पवार यांनी सर्वांची सांगड घातल्याचे सांगून उदयनराजेंना तिकीट दिले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला , त्यांच्यानंतर रामराजे निंबाळकर देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून हे दोघे सत्ता गाजवतील अशी शक्यता होती. परंतु उदयनराजे यांच्या या भाजप प्रवेशामुळे पुन्हा या चर्चाना उधाण आले आहे.उदयनराजे यांच्या ‘मी मिरवणार , सर्वांची जिरवणार ‘ हा स्वभाव भाजपमध्ये गेल्यावरही बदलेल यात शंका आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय सर्कस सुरु राहणार कि , तिन्ही राजांचे सूत्र भाजपमध्ये जुळणार ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.