मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही भाजप – शिवसेनेमध्ये राज्यात सत्तास्थापनेवरुन वाद निर्माण झाल्याने शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करून सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु केली आहे. यादरम्यान शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर वातावरण पेटल्याने भाजपाकडून संसदेत सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे आमंत्रण शिवसेनेला पाठवले नाही. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
येत्या १८ नोव्हेंबरला संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे रालोआतील एनडीएची बैठक होते. भाजपकडून शिवसेना , शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या बैठकीत अधिवेशनातील विविध विषयांवर चर्चा होते. मात्र गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला निमंत्रण पाठवण्यात आले नसल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे राज्यात आघाडीसह शिवसेनेचे सरकार बनत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले होते. दरम्यान, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महाशिवआघाडी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी तिन्ही पक्षांनी एक मसुदा तयार केला आहे. त्यानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.शिवसेनेला १४ मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १४आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती मिळणार आहे.
Visit : bahujannama.com