औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – सहा वर्षांच्या मुलासमोर पत्नीने चाकू भोकसून पतीची हत्या केल्याची घटना औरंगाबादमधील उल्कानगरी परिसरात घडली. शैलेश राजपूत असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. या प्रकरणाची माहिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचून शैलेशचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिेलेल्या माहितीनुसार, शैलेश आणि त्याची पत्नी यांच्या रात्री घरात वाद झाला असावा अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने पत्नीने रागात चाकूने पतीवर वार केले. यात पतीचा जागीच मृत्यू झाला. मात्र घरात असलेल्या 6 वर्षाच्या मुलाने फोन करुन नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र पत्नीने टोकाचं पाऊल उचलत पतीची हत्या का केली याचं अद्याप कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.