बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटला असून अनेक बैठकांचे सत्र करत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सत्ता स्थापनेच्या या उलथापालथीत मात्र या सर्वात चर्चा रंगलं ती दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीची. या बैठकीत नेमके काय चर्चा झाली, याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, ‘यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला सोबत काम करू अशी ऑफर दिली असल्याचा खुलासा स्वतः शरद पवार यांनी केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या भेटीसंदर्भात माहिती दिली. तसेच आपण ही ऑफर नाकारल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी अतिवृष्टी संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांनतर पंतप्रधानांनी त्यांना थांबण्यास सांगितले आणि आपण एकत्रित काम केल्यास आनंद होईल असे सांगितले. मात्र त्यावर पवार म्हणाले, आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत, आणि ते पुढेही राहतील परंतु राजकीय दृष्टया आपण एकत्र काम करणे मला शक्य नाही. तसेच पवार पुढे म्हणाले, ‘विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी नाही, त्यामुळे त्याची चिंता नको. एकत्रित येण्याचा तुमचा आग्रह मी स्वीकारू शकत नाही मी एक लहानसा पक्ष चालवतो, आमच्या पक्षातील नेत्यांना मी जी दिशा दिली आहे ती काही आता बदलणं शक्य नाही,’
दरम्यान, मागील विधानसभेला राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. या वेळी मात्र पवारांना राज्यात आणि केंद्रातही सत्ता मिळणार होती मग अशा वेळी शरद पवारांनी ही एवढी मोठी ऑफर का नाकारली असावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, महत्वाचे म्हणजे जर राष्ट्रवादीने भाजपशी हात मिळवणी केली असती तर सत्ता मिळाली असती परंतु या सत्तेवर संपूर्णतः जमव हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा राहिला असता आणि हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कदापि मान्य नसते. त्यांमुळे आता दुसरीकडे शिवसेनेत सोबत सत्ता स्थापन करून शरद पवारांनी स्वतःच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यावेळी शरद पवारांना ही ऑफर दिली, त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेससोबत मिळून शिवसेनेला सत्ता स्थापनेबाबत पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे जर पवारांनी भाजप सोबत जाण्याच्या निर्णय घेतलं असता तर त्यांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. त्यात महत्वाचे म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्या होत्या. जनतेने राष्ट्रवादीला भाजप विरोधात मतदान केले होते, अशात राष्ट्र्वादीने भाजपसोबत सत्ता स्थापन करणे, जनतेची फसवणूक असती. म्हणूनही पवारांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेच्या नेतृत्वात स्थापन झालेली महाविकास आघाडी आता कितीपट यशस्वी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Visit : bahujannama.com