मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘हिम्मत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या” म्हणणाऱ्या फडणवीसांना , ‘नुसत्या राज्यातच कशाला ? संपूर्ण देशात निवडणूक घ्या’ असे प्रत्युत्तर पवारांनी दिले आहे. एल्गार परिषद व कोरेगाव – भीमा प्रकरणाच्या तपासावरून सध्या राज्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना राज्यातील राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. ‘राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. सगळ्याच विषयांवर सगळ्यांची मतं जुळतील असं नाही. मात्र, एकूण व्यवस्थित चाललं आहे,’ असं ते म्हणाले.
जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान भाजपला दिलं होतं. त्यावर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल, असं फडणवीस म्हणाले होते. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी फडणवीसांच्या आव्हानाची खिल्ली उडवली. ‘फक्त महाराष्ट्रातच कशाला ? लोकसभेचीही निवडणूक घ्या. होऊन जाऊ द्या,’ असं पवार म्हणाले.