मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाइव्ह हे सरकारी वाहिनी ऐवजी खासगी वाहिनींवर थेट प्रक्षेपित केले जात आहे. गेल्या वर्षात तब्बल ३३ वेळा मुख्यमंत्र्यांचे लाइव्ह झाले आहे. त्यावरून हे प्रक्षेपण डीडी सह्याद्रीवर का केले जात नाही असा सवाल दूरदर्शनच्याच एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे. महेंद्र बैसाणे असे त्यांचे नाव आहे.
मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाइव्ह डीडी सह्याद्रीवर थेट प्रक्षेपित होण्यासाठी दूरदर्शनमधील अधिकाऱ्यांपासून ते मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभाग त्याचबरोबर केद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांपर्यंत बैसाणे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रादेशिक वाहिनीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा संवाद नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे का वाटत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री ठाकरे यांचे ३३ वेळा लाइव्ह झाले. मात्र, अपवाद वगळता सह्याद्रीवरून हा संवाद दाखवण्यात आला नाही. गतवर्षी २८ एप्रिलला यासंदर्भात आपण सह्याद्री वाहिनीशी पत्रव्यवहार केल्याचे बैसाणे यांनी सांगितले. तत्पूर्वी १६ ते १७ वेळा संवाद साधला होता. त्यानंतर एक दोन वेळा लाइव्ह दाखवण्यात. त्यानंतर मात्र, मागील परिस्थिती पुढे तशीच पुढे राहिली. १३ एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला मात्र, हा संवाद नागरिकांपर्यंत पोहाेचवणे सह्याद्रीला आवश्यक वाटले नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर सह्याद्रीकडून या वेळामध्ये संगीत नाटक दाखवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
भाषण दाखवणे बंधनकारक नाही
यासंदर्भात बोलताना प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेम्पती म्हणाले, सह्याद्री ही २४ तास वृत्तवाहिनी नाही. नियोजन करुनच लाइव्ह दाखवता येऊ शकते. त्यासाठी संबंधित माहिती आधी मिळणे आवश्यक आहे. त्याचबरेबर मुख्यमंत्र्यांचे भाषण दाखवणे बंधनकारक नसल्यचेही ते म्हणाले. तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची माहिती इतर वाहिन्यांना देण्यात येते त्याच वेळी ती सह्याद्रीलाही दिली जाते. शिवाय हा संवाद नियोजित नसतो. काही तास आधीच या संवादाचे नियोजन होते. तसेच दूरदर्शन हे केंद्राच्या अखत्यारित येत असल्याने यासाठी आग्रही भूमिका घेता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.