मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एकीकडे आपला देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे तर दुसरीकडे समाजातील सर्व घटक आम्हाला पुढारलेले नको तर अधिकाधिक मागास दाखवा, यासाठी झटताना दिसत आहे. समाजातील प्रत्येक घटक प्रवर्गाला आरक्षण हवे आहे. समाजाचा असा सर्वत्र उलटा प्रवास सुरू आहे, असा परखड सूर रविवारी ‘मॅजेस्टिक गप्पा’ कार्यक्रमात मान्यवरांनी लावला.
विलेपार्ले पूर्व येथे लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या सहकार्याने ‘मॅजेस्टिक गप्पा’मध्ये ‘आरक्षण कोठून, कुठे?’ या विषयावर हा परिसंवाद रंगला. त्यात राज्याचे माजी महाभिवक्ता श्रीहरी अणे, प्रा. हरी नरके, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढारे व दिलीप अलोणी यांचा सहभाग होता. पत्रकार आशिष जाधव यांनी त्यांना बोलते केले.
‘आज वेगवेगळ्या समाजांमधून आरक्षण घेण्याची मागणी होण्यामागे संधींचा अभाव हे मूळ कारण आहे. सरकारने सरकारी शिक्षण संस्था बंद करण्याचे धोरण अवलंबून खासगी संस्थांना प्रोत्साहन दिले आणि ते खर्चिक करण्यावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही. अधिकाधिक रोजगार निर्मितीवरही भर दिला नाही. परिणामी आरक्षण मिळाले तरच आपले भले होईल, अशी ठाम धारणा सर्व समाज घटकांमध्ये झाली आहे. त्यातून सर्वत्र आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे’, असे अणे यांनी निदर्शनास आणले. ‘आजच्या घडीला एससी, एसटी, ओबीसी आणि आता मराठा समाजासाठी केलेल्या एसईबीसी या प्रवर्गांतील सर्व जाती व प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गात ७४ जाती शिल्लक आहेत आणि त्या सर्वांनी सुद्धा आरक्षणाची मागणी मागास प्रवर्ग आयोगाकडे केलेली आहे. इतकेच नव्हे तर ओबीसीमधील अनेक जातींतील लोकांनी आम्हाला ‘भटक्या-विमुक्त’मध्ये समाविष्ट करा, अशी मागणी केली आहे. म्हणजे पुढारलेले होण्याऐवजी आम्हाला अधिकाधिक निम्न वर्गात बसवा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे एकीकडे आपण जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असताना दुसरीकडे मात्र अधोगतीकडे पावले टाकून उलटा प्रवास करत आहोत’, असे दाहक वास्तव यावेळी नरके यांनी मांडले. तर ‘आरक्षणाच्या बसमध्ये बसलेल्या वर्गाकडून बाहेर तिकीट घेऊन उभ्या असलेल्या वर्गांना प्रवेशच दिला जात नाही’, असे म्हणत आरक्षणातील असमानतेमुळे तिढा अधिकाधिक वाढत असल्याचे प्रतिपादन कोंढरे यांनी केले. तर ‘समाजात केवळ श्रीमंत व गरीब हे दोनच वर्ग असतात. त्यामुळे सर्व जातींचे आरक्षण रद्द करून ते सर्व समाज घटकांना केवळ आर्थिक निकषांच्या आधारेच द्यायला हवे’, असे मत अलोणी यांनी मांडले.
अणे व नरके यांनी आरक्षणाच्या प्रश्नातील कायदेशीर मुद्द्यांचा उहापोह यावेळी केला. त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या एम. जी. गायकवाड आयोगाच्या निष्कर्षांविषयी तसेच आयोगाच्या स्थापनेविषयी व त्यातील अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुकीविषयी नरके यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्याला कोंढरे यांनी त्यांच्या परीने उत्तरे दिली. आरक्षणाच्या इतिहासाविषयी चर्चा करताना नरके व अलोणी यांच्यामध्ये काही मुद्द्यांवर खडाजंगीही यावेळी रसिकांना पाहायला मिळाली.