पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचे भीती असली तरी, पोट स्वस्थ बसू देत नाही म्हणून भल्या सकाळी भाकरतुकडा करायचा आणि मजूरअड्ड्यावर येऊन थांबायचे… मागिल अनेक महिन्यांपासून आठवड्यातून दोन-तीन दिवस मजुरी मिळते, त्यावरच कुटुंबाची गुजराण करायची असा दिनक्रम मजूरअड्ड्यावरील मजुरांचा दिसून येत आहे. गावाकडे शेती आहे, ती पिकत नाही म्हणून शहरामध्ये रोजगारासाठी आलो आहे. काही मायमाऊली तर लेकराला घेऊन येथे थांबत असल्याची व्यथा मांडली हडपसर गांधी चौकातील मजूर अड्ड्यावरील मजुरांनी….
साहेब, आम्हालाही चांगले जीवन जगावे वाटते. अठरा विशे दारिद्र्य नशिबी पुजले आहे. पाऊसपाणी नाही म्हणून शेती पिकत नाही, रोजगार नाही, त्यामुळे पोटापाण्यासाठी आलो शहराकडे. मागिल काही वर्षांपासून चांगला रोजगार मिळत होता. मात्र, मागिल वर्षापासून कोरोना आला आणि आमचा रोजगार गेला. लिहिता वाचता येत नाही, व्यथा कोणाकडे मांडायची आणि आम्ही व्यथा मांडली तरी आमचे ऐकणार तरी कोण असा केविलवाणा सवाल येथील लेकराला पोटाशी धरून महिला मजूर वर्गाने मांडला. त्यांची व्यथा ऐकून हृदयामध्ये कालवाकालव झाली.
कोरोना वाढत आहे, त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे वारंवार सरकार सांगत आहे. आम्हाला तरी कुठे हौस आहे, रस्त्यावर येऊन उभे राहायची. आम्हालासुद्धा घरामध्ये आरामात राहायला आवडते. पण पोटापाण्यासाठी हजार-दीड हजार मैल पायवाट तुटवत शहरात आलो आहे. इथे आलो, तर तीच अवस्था दिसू लागली आहे. मायबाप सरकारने आम्हाला किमान रोजगार द्यावा, आम्हाला फुकटचे काही नको. आम्ही काम करू आमच्या लेकराबाळांना शिक्षण देऊ. पुढची पिढी तरी शिक्षण घेऊन चांगली राहील, असाही सूर त्यांच्यामधून उमटत होता.
हडपसरपासून जवळच असलेल्या वस्तीवर आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो. रोजगार मिळेल या आशेने भल्या सकाळी उठून घरात भाकरतुकडा बनवून येथे येतो. मात्र, नियमित मिळणारा रोजगार मागिल वर्षभरापासून गायब झाला आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस मिळतो, त्यातच कसेतरी घरभाडे द्यायचे आणि किराणा भरून घर चालवायचे असा आमचा दिनक्रम असल्याचे कर्नाटकासह राज्य-परराज्यातून रोजगारासाठी आलेल्या महिलांनी सांगितले.
मागिल वर्षी कोरोना वाढल्यामुळे गावाकडे गेलो. मात्र, गावाकडेही कोरोनाची अशीच परिस्थिती होती. दिवाळीनंतर कोरोना कमी झाला आणि पुन्हा रोजगारासाठी आलो आहे. मात्र, आता रोजगार मिळेनासा झाल्याने उपासमारीची वेळ येते की काय असे वाटू लागले आहे. कष्टकरी कामगारांना फुकट काही नको असते, त्यांना कष्टाचे दाम हवे आहे. शासनाने किमान रोजगार तरी उपलब्ध करून द्यावा, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. शिक्षण नाही, नोकरी नाही, त्यामुळे मिळेल ते काम करण्याची तयारी आहे. मात्र, कोरोनामुळे तेही आज मिळत नाही, असे त्यांची अवस्था आहे.
आता पोटाची खळगी भरायची की लेकराबाळांना शिक्षण द्यायचे. मागिल वर्षभरापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आमच्या हाताला काम नाही, त्यामुळे उपासमार होत आहे. तरीसुद्धा आजउद्या रोजगार मिळेल, पुन्हा सुरळीत होईल, या आशेवर दररोज मजूरअड्ड्यावर येऊन थांबत असल्याची करुण कहाणी ही मंडळी ऐकवित होती, त्यावेळी माझाही कंठ दाटून आला. वेळीच सावरले आणि तेथून बाय बाय करत काढता पाय घेतला. कोरोना लवकर जाऊ दे आणि या मजुरांच्या हाताला काम मिळू दे, एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे केली.