बहुजननामा ऑनलाइन टीम – ऑगस्ट महिन्यात यावर्षी 25 टक्के जास्त पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील हा पाऊस गेल्या 44 वर्षातला सर्वाधिक पाऊस असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. याआधी देशात 1976 मध्ये ऑगस्ट महिन्यात 28.4 टक्के अधिक पाऊस झाला होता. देशात सध्या सरासरीच्या 9 टक्के अधिक पाऊस झाला आहे. सिक्कीम, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यात अधिक पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत विचार केला तर यावर्षी देशातल्या धरणात पाणीसाठाही अधिक असल्याचं केंद्रीय जल आयोगानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात गेले 2 दिवस चांगला पाऊस होताना दिसत आहे. मुंबई तसंच उपनगरात पावसाची उत्तम हजेरी आहे. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर, वसई या ठिकाणी चांगला पाऊस पडताना दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही ठिकणी अधून मधून पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ऑगस्ट महिन्यात उत्तम पाऊस झाला आहे.
अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप
गेल्या 3 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळं मेळघाटात दिवसभर धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. सातपुडा पर्वतरांगा देखील आता हिरवाईनं नटल्याचं दिसत आहे. मेळघाटातही दमदार पाऊस आहे. दरवर्षी पावसाळ्यात इथं हजारो पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनामुळं यावर्षी पर्यटन बंद आहे.
नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस
कालपासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळं आणि पेंच जलाशयातील पाण्याच्या विसर्गामुळं नाग नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील नाथ नगरात पूर स्थिती उद्भवली आहे. तारसा येथील सांड नदीवरील पूल पूर्ण पाण्याखाली वाहून गेलाय. सध्या स्थानिक प्रशासनाचं तिथल्या परिस्थितीवर लक्ष आहे.
भंडारा जिल्ह्यातील पूरस्थिती
भंडारा जिल्ह्यात पोल्ट्री फार्ममध्ये 4 फूट पाणी शिरलं आहे. यामुळं तब्बल 3500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अनेक नदी नाल्यांना पूर आल्याचं चित्र आहे. इतकंच नाही तर या पुराच्या पाण्यानं शेतालाही वेढा दिला आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द गावातील गोविंद बोंद्रे या शेतकऱ्यानं आपल्या शेताला पूरक व्यवसाय म्हणून शेतावरच पोल्ट्री फार्म उभारणी केली होती. परंतु या पावसानं वैनगंगा नदी दुथडी भरून वाहात होती. त्यामुळं शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये 4 फूट पाणी शिरलं. त्यामुळं 3500 कोंबड्या मृत्यूमुखी पडून पाण्यावर तरंगताना दिसल्या. जवळपास 3 लाख 50 हजारांचं नुकसान आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळं आता शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.