बहुजननामा ऑनलाइन टीम – विधानसभा निवडणुकांपूर्वी पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याच पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आत्या-भाचा असे म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर टीकास्त्र डागले होते. त्याला आता ममता बॅनर्जी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कोलकातात बिगरशासकीय संघटना आणि अन्य संघटनांच्या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी संबोधित करत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, “अमित शाहा यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या भाषांमधून अहंकाराचा वास येतो. अशी भाषा एका केंद्रीय गृहमंत्र्याला शोभत नाही. तसेच तुम्ही सतत आमच्यावर आत्या-भाचा नात्यावरून टीका करता. पण, तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले?,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
केंद्राने राज्याला दिलेल्या निधीचा वापर तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने सिद्ध करावा आणि आरोप सिद्ध न झाल्यास मोदी सरकारने राजीनामा द्यावा, असे आव्हान देत ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यात गुंडगिरी आहे. बंगालला शांततेत राहू द्या. राज्यात भाजपची सत्ता येऊ देता कामा नये. मी सर्वाना बंगालच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन करते. मी भाजपाला घाबरत नाही. मी रस्त्यावर उतरुन लढणारी महिला आहे. मी शेवटपर्यंत संघर्ष करेन.
एक निष्पक्ष खेळ होऊ द्या. डावे आणि काँग्रेस भाजपाच्या संघा8त असू शकतात. परंतु, आम्ही एकट्याने लढू. मी केवळ एक गोलकिपर बनेन. बघुया तुम्ही किती गोल करता ते. मी सर्व बिगरशासकीय संघटना, स्वयंसहायता समुहांना आवाहन करते की, त्यांनी बंगालचा गौरव आणि बंगालची संस्कृती वाचवा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.