मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, आता यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार, उद्या (शनिवार) सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता उद्रेक लक्षात घेता ठाकरे सरकारने अनेक निर्बंध कडक केले आहेत. राज्यात विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद राहील. अत्यंत गरजेचे असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. तरीदेखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता या लॉकडाऊनची मुदत वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे फक्त विकेंडलाच नव्हे तर पुढचा आठवडाभर असे कडक निर्बंध लागू करण्याचा सरकार विचार करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच येत्या आठवड्यात सार्वजनिक सुट्ट्या जास्त आहेत. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.