मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशाची राजधानी दिल्ली येथे आज (शुक्रवार) सकाळी दाटून अंधारून आले. या बदललेल्या वातावरणाची झळ महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे. वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे राज्यात काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवसांत विदर्भात विजांसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1370266083471491077
हवामान विभागाने म्हटले आहे, पश्चिम विदर्भावर चक्राकार वारे सक्रिय झाले असून, आजपासून पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडले. तसेच या पावसासोबत विजांचा कडकडाटदेखील होऊ शकतो. त्यामुळे आकाशात ढगांची गर्दी दिसली तर उघड्या शेतावर कामाला जायचे शेतकऱ्यांनी टाळावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका प्रामुख्याने अकोला जिल्हा आणि पश्चिम विदर्भाला बसण्याची दाट शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल.
राज्यात काही भागात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, पुणे, नगर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहू शकते. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात सायंकाळनंतर ढगांची गर्दी होऊ शकते. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.